Friday, March 5, 2021

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने बॉलिवूड चिंतेत


फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई,पुण्यासह महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा हात-पाय पसरायला सुरुवात केल्याने बॉलिवूड काळजीत पडला आहे. ज्या निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा जाहीर केल्या होत्या, त्यांच्या पुढेही काय करायचं असा प्रश्न निर्माण झाला आहे. सिनेमागृहे पुन्हा बंद होतील का,हा प्रश्नही आहे. अक्षयकुमारचा 'सूर्यवंशी' चित्रपटाची रिलीज तारीख 2 एप्रिल जवळपास निश्चित झाली होती,पण आता त्याला अनिश्चितीचे ग्रहण लागले आहे. अशीच अवस्था 1983 च्या क्रिकेट वर्ल्ड कप आणि कपिल देववर बनत असलेल्या '83' चित्रपटाची झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे निर्माते काळजीत असले तरी नाउमेद झाले नाहीत.

सरकारी घोषणेनंतर चित्रपटगृहे शंभर टक्के उघडण्यात आली होती, मात्र ही चित्रपटगृहे मोठ्या चित्रपटाची अजूनही प्रतीक्षा करत आहेत. 19 मार्च ला यशराज फिल्म्सने अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'संदीप आणि पिंकी फरार ' तसेच टी सिरीजने जॉन अब्राहमचा 'मुंबई सागा' प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे.

या घोषणेमुळे वाटत होतं की बॉलीवूड रुळावर येत आहे. यशराज फिल्म्सने आपल्या पाच चित्रपटांची घोषणा करून जी सुरुवात केली होती,त्यामुळे निर्मात्यांचा आत्मविश्वास बळावला होता. परंतु वाढत्या कोरोना प्रकरणानंतर प्रदर्शन क्षेत्रात चिंतेची सावली आणखी गडद होताना दिसत आहे. महाराष्ट्रात सतत रोज आठ- नऊ हजाराचे रुग्ण पाहायला मिळत असल्याने निर्माते पुन्हा 'थांबा आणि वाट पहा' या परिस्थितीत असल्याचे दिसते. यात आणखी एक भर म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवश्यकता भासल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्याचा इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांना वाटतं की, खरेच चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने उघडी राहतील का ?आणि प्रेक्षक पूर्ण क्षमतेने चित्रपट गृहांकडे परततील का?

प्रदर्शनासाठी तयार चित्रपट

कोरोनाची महामारी मार्च 2020 पासून सुरू झाली, ते  नोव्हेंबर 2020 पर्यंत चित्रपटगृहांना टाळे लागले. या काळात कोणताच चित्रपट रिलीज होऊ शकत नव्हता. सरकारच्या शंभर टक्के क्षमतेने चित्रपट सुरू करण्याच्या घोषणेने काही निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांच्या रिलीजच्या घोषणा केल्या आहेत, असं मानलं जातं आहे की,  जवळपास 50 चित्रपट यावेळी रिलीजसाठी तयार आहेत. यशराज फिल्म्सने संदीप और पिंकी फरार', 'बंटी और बबली 2' , 'शमशेरा', 'जयेशभाई जोरदार' सोबतच 'पृथ्वीराज' या घोषणा मागच्या आठवड्यात केली होती.

ईद ला सलमान खानच्या 'राधे' चित्रपटाचे प्रदर्शन निश्चित झाले आहे. अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज' चे प्रदर्शन दिवाळीला आणि आमिर खानच्या'लालसिंह चड्डा' प्रदर्शन ख्रिसमासला करण्याचे ठरले आहे. काही चित्रपटांची ऍडव्हान्स बुकिंगदेखील सुरू झाली आहे. चित्रपट मालकांबरोबरच निर्मात्यांचा गमावलेला आत्मविश्वासही परतू लागला होता आणि तामिळ चित्रपट 'मास्टर' द्वारा प्रेक्षकही चित्रपटगृहांकडे परतू लागले होते. कोरोनाचे प्रमाण वाढत असतानाही 11 मार्च ला रिलीज होणाऱ्या जान्हवी कपूरच्या 'रुही' चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित केलं नाही.

सूर्यवंशी' वर सगळ्यांच्या नजरा

यावेळेला बॉलिवूडच्या निर्मात्यांच्या नजरा ज्या चित्रपटावर खिळल्या आहेत, तो चित्रपट आहे 'सूर्यवंशी'! या चित्रपटाचे निर्माते आहेत करण जौहर, रोहित शेट्टी, अरुण मेहता आणि रिलायन्स एंटरटेनमेंट!रिलायन्स आणि मल्टिप्लेक्स चेन पीव्हीआरवर  यांच्या प्रदर्शनाची जबाबदारी आहे.निर्मात्यांनी याच्या रिलीजची तारीख जाहीर केली आहे.  दुसरा मोठा  चित्रपट 2 एप्रिलला चित्रपटगृहांमध्ये रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. 

जर चित्रपट निश्चित तारखेला रिलीज झाला तर यामुळे बॉलिवूडच्या दुसऱ्या निर्मात्यांमध्ये उत्साह वाढणार आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर बॉलिवूडला जिवंतपणा येईल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लस घेतल्याने लोकांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत आहे महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी देशात अन्य ठिकाणी कोरोनाची प्रकरणे कमी दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहांकडे परतण्याची चिन्हे दिसत आहेत. लोकांमध्ये आता कोरोनाची पहिल्यासारखी भीती राहिलेली नाही. -मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Thursday, March 4, 2021

सीक्वेलच्या गर्देत सापडला हिंदी सिनेमा


सलमान खानला घेऊन आदित्य चोप्राने 'टायगर 3' ची घोषणा केली आहे. हा 'एक थर टायगर', 'टायगर जिंदा है' या चित्रपटांचा तिसरा भाग आहे. सध्याला बॉलिवूडमध्ये 'दोस्ताना 2', 'बागी 4, 'बंटी और बबली 2', ' क्रिश 4', 'अपने 2, ' गो गोवा गोन 2' सारख्या हिट चित्रपटांचे सीक्वेल बनत आहेत. त्यामुळे बॉलिवूडच्या रथाची चाके जुन्या-पुराण्या रिमेक आणि हिट चित्रपटांच्या सीक्वेलमध्ये अडकली असल्याचे दिसत आहे.

सीक्वेल चित्रपट बनवणे आता सोपा आणि सोयीचा धंदा झाला आहे. कारण एक सीक्वेल चित्रपट कमीत कमी पाचशे कोटींचा व्यवसाय देऊन जात आहे. 'धूम' चित्रपटांच्या श्रुखलेच्या तीन चित्रपटांनी आठशे कोटींचा व्यवसाय मिळवून दिला. 'बाहुबली' च्या दोन चित्रपटांनी दणक्यात रेकॉर्ड ब्रेक अडीच हजार कोटींचा व्यवसाय केला. सलमान खानने पोलिसांची वर्दी घालून दंबगिरी करत तीन चित्रपटांच्या माध्यमातून हजारो कोटी कमावले. बाकीच्या फुटकळ चित्रपटांची कमाई तर सोडूनच द्या. बागी, क्रिश, रेस, हाऊसपुल, गोलमालसारख्या चित्रपटांनी तर 500-500 कोटींच्या वर कमाई केली. कमाई करताना तुम्हाला फक्त त्यातलं टेक्निक माहीत असायला हवं.
सीक्वेल चित्रपट बनवताना तुम्हाला फार काही मेहनत करावी लागत नाही. फक्त एका संत्र्याचा ज्यूस काढा. आणि  तो जो चोथा राहिला आहे, त्यात थोडी साखर आणि बर्फ टाका. त्यात पाणी घालून पुन्हा मिक्सरला लावून घुसळा. झाला ज्यूस तयार. अशा प्रकारे ज्यूस तयार करत राहा. वास्तविक चित्रपट व्यवसाय आता मिठाईच्या धंद्यासारखा झाला आहे. साखरेच्या पाकात गुलाब जामून बुडवून द्या. मिठाईचे दुकान साखरेवरच चालते, तसे बॉलिवूड फक्त सीक्वेलवर चालत आहे. साखरेचा पाक बनवायचा.त्यात गुलाब जामून टाकायचे.गुलाब जामून विकल्यावर उरलेल्या पाकातून जिलेबी बुडवून काढायची.  तरीही साखरेचा पाक उरला तर आणखी एकादा पदार्थ बुडवून काढायचा. सगळी मिठाई साखरेपासूनच बनते, पण सगळ्यांची चव वेगवेगळी राहते. मिठाईवाला 'साखरेच्या नावानं चांगभलं ...: म्हणतो तर सिनेमावले ' सीक्वेलच्या नावाने चांगभलं...' म्हणताहेत.
हा खेळ साधासोपा आहे. धावणाऱ्या घोड्याच्या शेपटीला काहीही बांधले तरी तेही धावायला लागते. हा जुनाच प्रकार आहे आणि हा बोलपटांपासून चालला आहे. 'हंटरवाली’ (1935) चित्रपट हिट झाला होता. तेव्हा वाडिया बंधूंनी 'हंटरवाली की बेटी ' (1943) बनवला. दोन्ही चित्रपट चालले आणि तिथून सीक्वेल चित्रपटांचा व्यवसाय चालू झाला. आज हा व्यवसाय कमाईचा महत्त्वाचा घटक बनला आहे.
यशराज फिल्म्स तर बॉलिवूडचे नाक आहे. या  कंपनीने अलीकडेच ' एक था टायगर', 'टायगर जिंदा है',  बनवले. आता या चित्रपटांचा सीक्वेल ' टायगर 3' बनवण्याची घोषणा केली आहे. आतापर्यंत या दोन 'टायगर' चित्रपटांनी 900 कोटींपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. टायगर (सलमान खान) भारतीय रॉ एजंट आहे. तो पाकिस्तानी गुप्तचर एजंट संस्था 'आयएसआय'ची एजंट जोया (कॅटरिना) शी भिडतो.  दोघे प्रेमात पडतात आणि 900 कोटी यशराज फिल्म्सच्या अकाऊंटमध्ये टाकतात. आता 'टायगर 3' या तिसऱ्या चित्रपटात लेखक आदित्य चोप्रा या दोघांना पुन्हा एकदा तिसऱ्या मिशनवर पाठवणार हे नक्की.
यशराज फिल्म्स आणि करण जौहरची धर्मा प्रोडक्शन्स  यासारख्या अनेक कंपन्या आधुनिक सिनेमाच्या फॅक्टऱ्या आहेत, ज्या सिनेमे बनवत नाहीत तर उगवतात. इतक्या चित्रपटांसाठी कथा कोठून आणतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, त्यांच्यासाठी हे सारं सोप्पं आहे. करण जौहर याच्या वडिलांनी 1980 मध्ये 'दोस्ताना' नावाचा चित्रपट बनवला होता. याच नावाने करणने 2008 मध्ये 'दोस्ताना' बनवला. आणि आता त्याच 'दोस्ताना ' नावाच्या चित्रपटाचा सीक्वेल 'दोस्ताना 2' नावाने बनवला जात आहे. त्याच्या वडिलांनी 1990 मध्ये बनवलेल्या 'अग्निपथ'ला 2012 मध्ये त्याने  पुन्हा 'अग्निपथ' नावाने बनवला आणि अडीचशे कोटींचा गल्ला जमवला. करण शेवटी करणार काय?
आजकाल सगळे हेच करत आहेत. त्यामुळे हिंदी सिनेमा एक तर रिमेकवर चालला आहे नाहीतर सीक्वेलवर! या हिंदी सिनेमाच्या रथाचे एक चाक सीक्वेलच्या खड्ड्यात अडकले आहे तर दुसरे रिमेकच्या चिखलात रुतले आहे. यातून बॉलिवूडच्या रथाची चाके बाहेर निघणं कठीण आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली 9423368970

Friday, February 26, 2021

आता बॉलिवूडमध्ये नव्या जोड्यांचा ट्रेंड


यावर्षी अशा काही जोड्या सिनेमांमध्ये पाहायला मिळणार आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी यापूर्वी कधीच एकत्र पाहिले नाही.  यांमध्ये अशी काही जोडपी आहेत जी वास्तविक जीवनात जीवनासाथीदेखील बनणार आहेत.  यातली आणखीही काही जोडपी आहेत,जी पाहिल्यावर आपल्याला तोंडात बोटे घालावी लागणार आहेत.अजय देवगन आणि आलिया भट्टची जोडी पहिल्यांदा रोहित शेट्टी यांच्या आगामी ‘गोलमाल 5’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येत आहेत.अर्थात  चित्रपटाच्या रिलीजनंतरच ही जोडी प्रेक्षकांना किती आवडते हे पाहावे लागणार आहे.

ऋत्विक रोशन - दीपिका पादुकोन ही जोडी पहिल्यांदाच सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फाइटर’ चित्रपटात  पाहायला मिळणार आहे. 'फायटर' हा एक रोमँटिक अ‍ॅक्शन  चित्रपट आहे.  अक्षय कुमार सोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान 'अतरंगी रे' मध्ये दिसणार आहे.  याचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले आहे.  या चित्रपटात धनुषही दिसणार आहे.  आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर पहिल्यांदा 'चंडीगड करे आशिकी' चित्रपटात दिसणार आहेत. या रोमँटिक-विनोदी चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करत आहेत. हॉरर-कॉमेडी असलेल्या 'भूलभूलैया 2' चित्रपटात कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.  हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या  'भूलभुलैया'  या चित्रपटाचा हा रीमेक आहे.  राजकुमार राव आणि जाह्नवी कपूर ही जोडी  'स्त्री' चा सिक्वेल असलेल्या 'रुही' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार आहे. या कॉमेडी-हॉरर चित्रपटात जान्हवी कपूर ग्लॅमरस अंदाजात आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक मेहता अहेत.


  'ब्रह्मास्त्र'मध्ये आलिया-रणबीर

आलिया भट्ट सांगते की ती चित्रपटात देखील नव्हती, तेव्हापासून रणबीर कपूरचीही फॅन आहे. आता हे दोघे 'ब्रह्मास्त्र' मध्ये एकत्र काम करत आहेत, त्यामुळे प्रेक्षकही ही जोडी ऑनस्क्रीन पाहण्यास उत्सुक आहेत. जॅकलिन फर्नांडिज आणि रणवीर सिंगची जोडीही पहिल्यांदाच एकत्र ‘सर्कस’ चित्रपटात दिसणार आहे.  रोहित शेट्टी या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. हा चित्रपट शेक्सपियरच्या 'कॉमेडी ऑफ एरर'वर आधारित आहे.  फरहान अख्तर बॉक्सिंगवर आधारित 'तुफान' चित्रपटात दिसणार आहे, यात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर असणार आहे.  हा चित्रपट रिलीज होण्याच्या तयारीत आहे. यावर्षी रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरची जोडी लव रंजनच्या एका अनामिक चित्रपटात दिसणार आहे.  कार्तिक आर्यन आणि जाह्नवी कपूर 'दोस्ताना 2' मध्ये एकत्र दिसणार आहेत.  या चित्रपटाची निर्मिती करण जोहर यांनी केली आहे.  दिग्दर्शक संदीप रेड्डीच्या 'अ‍ॅनिमल'मध्ये रणबीर कपूर याची जोडी परिणीती चोप्रासोबत दिसणार आहे.  या चित्रपटात अनिल कपूरसुद्धा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.  सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी 'शेरशाह'मध्ये दिसणार आहेत.  या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णुवर्धन यांनी केले असून चित्रपटाचे सह-निर्माता करण जोहर आहेत.  जुलै 2021 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.

आयुष्मान खुरानाची जोडी ‘डॉक्टर जी’ मध्ये रकुल प्रीत  सोबत दिसणार आहे.  अनुभूती कश्यप दिग्दर्शित हा हलका-फुलका रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे.  'पति पत्नी और वो' मध्ये अभिनय दाखवल्यानंतर अनन्या पांडे पुन्हा एकदा 'लायगर' चित्रपटात दिसणार आहे.  या सिनेमात ती विजय देवरकोंडाच्या अपॉझिट आहे. पुरी जगन्नाथ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवला जात आहे.  अनन्या पांडे हिचा हा चित्रपट सप्टेंबर 2021 मध्ये रिलीज होईल.  याशिवाय सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन पहिल्यांदाच 'युधरा' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा रवी उदयवार दिग्दर्शित रोमँटिक अ‍ॅक्शन चित्रपट आहे.

2021 मध्ये रिलीज होणाऱ्या चित्रपटांमध्ये ही जोडपी धमाल करणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व जोडप्यांनी यापूर्वी कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही.  यामुळे ही नवोदित जोडपी काय धमाल करणार हे लवकरच कळणार आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Saturday, February 20, 2021

नंबर वन कोण?


सध्याच्या काळात बॉलिवूडमध्ये नंबर वन कोण याचीच चर्चा सुरू आहे. सलमान खान की अक्षय कुमार यावर सध्या खल चालला आहे. अक्षय कुमार लोकांचे आवडते कलाकार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र शाहरुख खानची 'नंबर वन'ची खुर्ची धोक्यात आली आहे. इकडे सलमान खान शाहरुख खानचे कौतुक करताना बॉलिवूडचा 'किंग ' शाहरुखच असल्याचे सांगत आहे. काही दिवसांपर्यंत शाहरुख आणि सलमान यांच्यात साधा विस्तवही जात नव्हता मात्र आता त्यांच्या शत्रुत्वामध्ये मैत्री निर्माण होत असल्याचे हे संकेत आहेत. कारण या दोघांनीही एकमेकांच्या चित्रपटांमध्ये पाहुणा कलाकार म्हणून हजेरी लावली आहे. दुश्मनी फार काळ टिकत नाही,हेच खरे. शाहरुखचा 200 कोटी बजेटचा चित्रपट  'झिरो' बॉक्स ऑफिसवर सपशेल कोसळला असताना बॉलिवूडचा 'किंग' शाहरुख खान कसा असू शकतो, असा प्रश्न चित्रपट चाहत्यांना  पडला आहे. त्याच्या मागच्या चित्रपटांच्या आलेख किंवा गल्ल्याचा विचार केला तरी त्याची परिस्थिती लक्षात येते. कालपर्यंत तरी सलमान की शाहरुख यांच्यात नंबर वन कोण असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र आता हा प्रश्नच बदलला गेला आहे. दोन्ही खानांना प्रतिस्पर्धी म्हणून उभा केलेल्या लोकांना सलमानद्वारा शाहरुखचे कौतुक ऐकताना घेरी आली आहे. आता लोकांना कोण समाजावून सांगणार की शाहरुखने सलमानच्या 'ट्युबलाईट' मध्ये आणि सलमानने शाहरुखच्या 'झिरो'मध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आहे.

सलमानने तर त्याच्या 'राधे' चित्रपटाचे व्हिएफएक्स' शाहरुख खानच्या रेड चिलीज कंपनीत केले आहे. व्यवसायाबरोबरच मैत्री आणखी दृढ करताना शाहरुख खानच्या 'पठान' चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून काम करण्याचे निश्चित करताना दोघांनी चित्रपटाचे वजनही वाढवले आहे. लेखनी बहाद्दर शाहरुख-सलमान यांना एकमेकांसमोर उभे करत असताना हे दोघे मात्र एकमेकांच्या गळ्यात गळे घालून एकमेकांचे कौतुक, मैत्री आणि व्यवसाय जोपासताना दिसत आहेत. 

आमिर खानचा मुलगा चित्रपटात

कालपर्यंत श्रीदेवीची दुसरी मुलगी चित्रपटात येणार असल्याची आणि प्रसिध्द दिग्दर्शक बोनी कपूर वयाच्या 65 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकणार असल्याची चर्चा असतानाच आणखी एक बातमी येऊन थडकली आहे, ती म्हणजे आमिर खानच्या मुलाची! आमिर खान त्याच्या मुलाला कॅमेऱ्यासमोर उभे केल्याची ही बातमी असून चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याची चर्चा आहे. अर्थात यात नव्हे काय आहे, असा सवाल तुम्हाला पडला असणार! उद्या शाहरुख खानची मुलं-मुलीदेखील चित्रपटात येतील. यात सलमान खान बराच मागे आहे, पण उद्या कदाचित त्याचीही मुलं-मुली चित्रपट सृष्टीत येतील. उलट लोकांनाही तसंच वाटतं. आमिर खानचा मुलगा जुनैद याने 'महाराजा' नावाच्या चित्रपटासाठी कॅमेऱ्याच्या सामोरा गेला आहे. वास्तविक त्याच्या वडिलांनी आमिरने याअगोदर त्याला कॅमेऱ्याच्या मागे उभे केले होते. 2014 मध्ये आलेल्या राजकुमार हिरानी यांच्या 'पीके' साठी त्याला त्यांचा असिस्टंट बनवले होते. आता जुनैद पडदयावर एन्ट्री करणार आहे. यश चोप्रा यांच्या कंपनीद्वारा सिद्धार्थ दिग्दर्शित बनवल्या जात असलेल्या 'महाराजा' चित्रपटात तो एक पत्रकार म्हणून प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. 'महाराजा' हा चित्रपट 1862 मधील सत्य परिस्थितीवर आधारित आहे.  यात करसनदास मूलजी या गुजराती पत्रकाराने त्याच्या 'सत्यप्रकाश' या वृत्तपत्रात महिलांवर अत्याचार करणाऱ्या जदूनाथजी ब्रजरत्न महाराज यांची बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमी नंतर खूप वाद उफाळला होता आणि हे प्रकरण शेवटी न्यायालयात पोहचले होते. यात पत्रकाराचा विजय झाला होता. 


सूरज बडजात्या सक्रिय

 असं वाटतंय की, चित्रपटवाल्यांनी आपल्या मुला-मुलींना सिनेमात आणण्यासाठी स्पर्धाच लावली आहे की काय?  ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ हैं’ सारखे चित्रपट बनवणारे सूरज बड़जात्यादेखील यावर्षी आपल्या मुलाला- अनवीशला चित्रपट क्षेत्रात आणण्याच्या तयारीत आहेत. गेल्या पाच वर्षात सुरज बडजात्या यांनी एकही चित्रपट केला नाही. अर्थात त्यांच्या दिग्दर्शनात एक चित्रपट तयार झाला की किमान ते चार पाच वर्षांचा गॅप राहत असतोच, पण यंदा त्यांच्याविषयी नवीनच ऐकायला मिळत आहे. एका वर्षात ते कमाल तीन चित्रपटांवर काम करणार आहेत म्हणे. मागे असे ऐकायला मिळाले होते की, सुरज बडजात्या अमिताभ बच्चन आणि बोमन इराणी यांना घेऊन एक चित्रपट करत आहेत. याशिवाय सलमानला घेऊनही एक चित्रपट करत आहेत, असेही कानावर आले आहे. शिवाय ते स्वतःच्या मुलालाही पडद्यावर आणणार असल्याने ते नेमके किती चित्रपट करणार आहेत, याचा लवकरच खुलासा होईल. त्यांची आजपर्यंतची कारकीर्द पाहता ते एका वर्षात तीन चित्रपट करणं शक्य नाही.- मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली


Friday, February 19, 2021

बॉलिवूड कलाकारांची हॉलिवूड 'भरारी'


बॉलिवूडच्या कलाकारांना हॉलिवूडचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. विशेष म्हणजे काही बॉलिवूडच्या अभिनेता-अभिनेत्रींनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचे जलवे ' दाखवलेही आहेत. विषय आणि आवश्यकतेनुसार बॉलिवूडदेखील हॉलिवूडच्या कलाकारांना 'गांधी' सारख्या चित्रपटांमध्ये संधी देत आला आहे. आजतागायत हे सांस्कृतिक आदान-प्रदान चालूच आहे. सध्या बॉलिवूडचे काही कलाकार हॉलिवूड चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. या सक्रीयतेवर एक दृष्टिक्षेप...

भारतीय चित्रपटांमध्ये आपले स्थान पटकवल्यानंतरआणि देशभर प्रसिद्धी मिळाल्यानंतर प्रत्येक कलाकाराची आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले 'हुनर'  दाखवण्याची,त्याचा प्रसार करण्याची इच्छा असते. आंतरराष्ट्रीय सिनेमामध्ये हॉलिवूडची आपली एक प्रतिष्ठा आहे. बॉलिवूडच्या जुन्या कलाकारांचा विचार केला तर आपल्याला असे लक्षात येईल की, शशी कपूर, ओमपुरीपासून इरफान खानपर्यंत अनेकांनी हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपले एक स्वतःचे स्थान निर्माण केले होते. या स्पर्धेत आपल्या अभिनेत्रीदेखील मागे नाहीत. ऐश्वर्या रॉय, मल्लिका शेरावत,  प्रियांका चोप्रा, दीपिका पादुकोन यांनी देखील हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपला 'हुनर' दाखवला आहे.

नवीन पिढी सक्रिय

हॉलिवूड चित्रपटांमध्ये सध्या ज्या अभिनेत्री सक्रिय आहेत, त्यात डिंपल कापडियांचे यांचे नाव पुढे आहे. डिंपल यांनी हॉलिवूड दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलन यांच्या 'टेनेट' चित्रपटामध्ये काम केले आहे. हा चित्रपट 2020 मध्ये ब्रिटन आणि अमेरिकेत प्रदर्शित झाला होता. रणदीप हुडडा याने 'मान्सून वेडिंग' मध्ये काम केले होते. याशिवाय त्याने  2020 प्रदर्शित झालेल्या  ‘एक्सट्रेक्शन’ मध्येदेखील काम केले आहे. यात क्रिस हॅम्सवर्थने प्रमुख भूमिका साकारली होती. हा चित्रपट सध्या नेटफलिक्सवर पसंद केला जात आहे. पंकज त्रिपाठी यांनीदेखील या चित्रपटात काम केले आहे. सुनील शेट्टीसुद्धा जॅफरी चीन यांच्या 'कॉल सेंटर' चित्रपटात सरदार पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करत आहे. अली फजल 'डेथ ऑन द नील' चित्रपटात काम करत आहे. प्रियांका चोप्रा हिचे 'मॅटरिक्स’, ‘टैक्स्ट फॉर यू’ देखील लवकरच प्रदर्शित होणार आहेत.

खूप प्रसिद्धी मिळवली

इरफान खान यांना हॉलिवूडमध्ये चांगल्या संधी मिळत होत्या. मात्र गेल्या वर्षी त्यांचे निधन झाले. 'जुरासिक वर्ल्ड’, ‘लाइफ आॅफ पई’, ‘आइ लव यू’, ‘द नेमसेक’, ‘न्यूयार्क’ ,‘द अमेजिंग स्पाइडरमैन' सारख्या चित्रपटांमध्ये इरफान खान यांनी काम केले आहे. ओम पुरी यांनीदेखील 'सिटी आफ जॉय’, ‘माय सन द फेनेटिक’, ‘ईस्ट इज ईस्ट’सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करून आपले एक वेगळे स्थान निर्माण केले होते. अमरीश पुरी यांनी स्टीवन स्पीलबर्गच्या 'इंडियाना जोंस एंड द टैम्पल आॅफ डूम' मध्ये जबरदस्त अभिनय केला होता. नसीरुद्दीन शाह यांनी ‘मानसून वेडिंग’, ‘द लीग आॅफ एक्स्ट्राआडनरी जैंटलमेन’ सारख्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनिल कपूरनेही  हॉलीवुडच्या ‘स्लमडॉग मिलियनेयर’, ‘मिशन इंपासिबल’ आणि ‘प्रोटोकोल’मध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

हॉलीवुडपासून लांब

अमिताभ बच्चनपासून सलमान खान पर्यंतच्या कलाकारांना हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर मिळत असतात. पण काही कलाकारांना हॉलिवूड चित्रपटांमध्ये स्वारस्य नसल्याचेही पाहायला मिळते. यात सर्वात पुढे नाव येते ते करिना कपूरचे! करिनाला कित्येकदा हॉलिवूडच्या ऑफर आल्या होत्या,पण तिने त्या साफ नाकारल्या. ती आजोबा राज कपूर यांच्या 'जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहां' या गाण्याची आठवण करून देत हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करायला नकार देते.याशिवाय सलमान खान यालाही  काही हॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, मात्र त्यानेही त्या धुडकावल्या. मात्र त्याने 2007 मध्ये आलेल्या 'मेरीगोल्ड' या हॉलिवूड चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्याने या चित्रपटांना रामराम ठोकला. अमिताभ बच्चन यांनीदेखील पूर्वी 'द ग्रेट गॅटसबॉय' या एका हॉलिवूड चित्रपटात काम केले होते, मात्र नंतर त्यांनीही हॉलिवूड चित्रपटात काम करण्याचे स्वारस्य दाखवले नाही.

 अभिनेत्री सक्रिय

बॉलिवूड मधील काही अभिनेत्रींनी 'बॉलिवूड ते हॉलिवूड' असा प्रवास केला आहे. यात ऐश्वर्या रॉय-बच्चन, प्रियांका चोप्रा, मल्लिका शेरावत,दीपिका पादुकोन, नर्गिस फाक्री, तब्बू, फ्रीडा पिंटो, डिंपल कापडिया आदींचा समावेश आहे. ऐश्वर्याने ‘ब्राइड एंड प्रेजुडिस’, ‘प्रोवोक्ड’, ‘मिस्ट्रेस आॅफ स्पाइसेस’, ‘द पिंक पैंथर’मध्ये काम केलं आहे. फ्रीडा पिंटो हिने ‘स्लमडाग मिलियनेअर’ मध्ये खूप लोकप्रियता मिळवली.  तब्बूने ‘द नेमसेक’ आणि ‘लाइफ आफ पई’ मध्ये काम केलं आहे. नर्गिस फाक्री ‘स्पाई’ या हॉलिवूड चित्रपटात काम केले आहे. प्रियांका चोप्रा हिने तर अभिनयाबरोबरच गायिका म्हणून ही धुमाकूळ घातला आहे. तिचा  ‘बेवॉच’ हा हॉलिवूड पट चांगलाच चर्चेत राहिला . याशिवाय  बॉलिवूडमधील मोस्ट टांलेंटेड आणि सर्वात महागडी अभिनेत्री म्हणून जिचे नाव घेतले जाते,त्या दीपिका पादुकोननेदेखील 'ट्रिपल एक्स' या हॉलिवूडपटात प्रसिद्ध अभिनेता  विन डीजलसोबत काम केले आहे.-मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

Monday, February 15, 2021

चिकण्या चेहऱ्याचा रावण


आजकाल कॉर्पोरेट कंपन्यांचं नाणं फिल्मी जगतात खणखणीत चाललं आहे.  कंपन्या आपल्या थैल्या उघडून उभ्या आहेत. एक-दोन नव्हे तर अर्धा डझन चित्रपटांची घोषणा करा. पैशांची अजिबात कमतरता नाही.  आम्हाला पैशांची गुंतवणूक करायची आहे. आम्हाला चित्रपट कसे बनवायचे हे माहित नाही, आम्हाला गुंतवणूक करायची आहे.  म्हणून आम्ही पैसे गुंतवतो.  तुम्ही अर्धे निर्माता व्हा, आम्ही अर्धे निर्माते.  तुम्हीही मोठे व्हा आणि आम्हीही.तुमचाही विकास होईल आणि आमचाही, अशी   परिस्थिती सध्या आहे ज्यावेळेला निर्माता-दिग्दर्शक एक ग्लास दुधाची मागणी करतात तेव्हा कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या दारात म्हशी बांधण्यासाठी येतात.  फक्त हुकूम करा.  पैसा रोलिंग होत राहिला पाहिजे. कथेचं काय घेऊन बसलात, फक्त 'हिरो'ची तारीख घेऊन या.

मागे ऋत्विक रोशन आणि दीपिका पादुकोण हे मधू मन्तेनाच्या रामायणवर आधारित थ्रीडी चित्रपटात काम करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.  त्यानंतर मन्तेना महाभारतावर एक चित्रपट बनवणार असून यात दीपिका पादुकोण बहुधा द्रौपदीची भूमिका साकारणार आहे.  रामायणवर तयार होत असलेल्या चित्रपटाला भव्यपणा देण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचं सांगण्यात येतंय.

घोषणा ऐकून त्यांच्या चाहऱ्यांनी  त्यांच्या त्यांच्या चाहत्यांनी आपापल्या परीने चिल्लर गोळा करायला सुरुवात केली. कारण ऋत्विकसारखा चिकना राम आणि दीपिकासारखी सुंदर अभिनेत्री सीतेच्या पहेरवात पाहण्याचे भाग्य मिळेल.  दोघांना राम-सीता म्हणून पहाण्याची प्रेक्षकांनीही कल्पना सुरू केली होती.  पण मन्तेना म्हणाले की ऋत्विक रावण होईल. मग या चाहत्यांची मोठी निराशा झाली.  फक्त कल्पना करा.  सिक्स पॅक्ससह दिसणारा 'छोरा' नऊ डोकी डोक्यावर घेऊन कसा दिसेल? कसे वाटेल.  पाणीपुरीमध्ये आईस्क्रीम घालून कोणी पाणी खाईल का?

बहुतेक वाटतं की, ऋत्विकला राम बनण्यासाठी आपल्याला आणि त्याला अजून वाट पाहावी लागेल.यापूर्वी पहिल्यांदा राम बनवण्याचा प्रयत्न त्याचे सासरे म्हणजेच संजय खानने केला होता.  खान यांनी 2013 मध्ये ‘द लीजेंड आॅफ राम’ बनवण्याची  घोषणा केली होती.दीडशे कोटीच्या आसपास यासाठी लावणार होते.  सगळी तयारी झाली होती. शूटिंग लंका म्हणजेच श्रीलंका ममध्ये होणार होती.  जायद खान लक्ष्मण आणि अमिताभ बच्चन रामाचे पिता दशरथ बनणार होते. पण मांजर आडवं गेलं आणि ‘द लीजेंड आॅफ राम’ चित्रपट बनू शकला नाही.

मर्यादा पुरुषोत्तम राम कोणाला व्हायचं नाही. सलमान खानसुद्धा राम बनणार होता. त्याचा भाऊ सोहेल खानने खूप वर्षांपूर्वी त्याला राम बनवण्याची घोषणा केली होती. रामाने सोन्याचे हरीण मारले होते तर सलमानवर काळे हरीण मारण्याचा आरोप झाला. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीत मोठा धुमाकूळ झाला. सगळीकडूनच सलमानची निंदा झाली. आणि या निंदेत आणि कोर्ट कचेरीच्या भानगडीत सोहेलचा राम हरवून गेला. 

आता असं वाटतं की, या फिल्म इंडस्ट्रीला रामाअगोदर रावणाची गरज आहे. त्यामुळे पहिल्यादा रावणाचा शोध सुरू झाला आहे. आता टी सिरीजवाल्यांनी सैफ अली खान याला रावण बनवले आहे. "आदिपुरुष' या चित्रपटात तो रावण बनणार आहे. यांनीदेखील 'बाहुबली'फेम प्रभाषच्या रूपाने रामाच्या भूमिकेसाठी नंतर निवड केली.पहिल्यांदा साडेपाच फूट असणाऱ्या सैफ अली खानला आठ फुटाचा रावण बनवला. नकली नऊ डोकी लावून आणि 'मैं लंकेश' म्हणत गडगडाट करत सैफ असेल तेव्हा तैमुर म्हणेल ,'पापा पागल हो गये हैं' करीना कपूर खान तोंड दाबून हसत सुटेल आणि विचार करेल की, या दसऱ्याला तैमुरला  रामलीला दाखवण्याची वेळ आली आहे.


बॉलिवूड कलाकार आणि त्यांची लग्ने


बॉलिवूड कलाकार आणि त्यांचे लग्न हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. कोण कोणाशी लग्न करणार आणि वय उलटत गेलं तरी ही बया किंवा बाबा का अजून करत नाहीत, अशा सारख्या चर्चा मागे सातत्याने वाचायला, बघायला मिळायच्या. काहीजणांनी तर आपलं करिअर बरबाद होऊ नये म्हणून लग्न करायचं टाळलं तर काही जणांनी आपलं लग्न माध्यम आणि आपल्या चाहत्यांपासून लपवले. गोविंदाने कित्येक वर्षे आपल्या करिअरला धोका पोहचेल म्हणून आपलं लग्न झाल्याचं सांगितलं नाही. परंतु आता परिस्थिती बदलत आहे. लोकंही कलाकारांची लग्ने आणि त्यांनाही आयुष्य आहे हे स्वीकारायला लागले आहेत. राणी मुखर्जीने लग्न झाल्यावरही चित्रपटात काम केलं. ऐश्वर्या रॉय-बच्चन, दीपिका पादुकोन हेही  काम करत आहेत. हा कालानुरूप बदल आपण स्वीकारालाच पाहिजे. कोरोना काळाने तर सगळ्यांनाच मोठा धडा दिला आहे. यामुळे अनेक माणसं आपल्या लोकांच्या सानिध्यात राहिली. काहींना आपली माणसं कळली, समजून घेता आली. यात बॉलिवूड कलाकारदेखील मागे नाहीत. याच कोरोना लॉकडाऊन काळात अनेक कलाकारांनी आपली लग्ने उरकली तर काही कलाकार 

2021 मध्ये लग्नाच्या बेढीत अडकायला आतुर आहेत. यात सगळ्यात सुरुवातीला नाव येतं ते रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचं. रणबीर कपूर यापूर्वी नेहमीच 'लव्हर बॉय'च्या छबीत कैद असल्याचं आपण पाहिलं आहे. आणि त्याने  कित्येक सुंदर अभिनेत्रींचे हृदयदेखील तोडून टाकली आहे. मग कॅटरिना कैफ असो किंवा दीपिका पादुकोन. रणबीर कपूर सुरुवातीपासूनच प्रेम आणि ब्रेकअपच्या कारणाने सतत चर्चेत राहिला आहे. पण आता रणबीर कपूर तिच्या पेक्षा दहा वर्षे लहान असणाऱ्या आलिया भट्टच्या प्रेमात आहे. 

रणबीर-अलिया प्रेमाच्याबाबतीत इतके गंभीर आहेत की रणबीर कपूर आणि  तिने यापूर्वी आधीच आपल्या लग्नाची योजना आखली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पडलेले लॉकडाऊन  रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांच्या निधनामुळे त्यांचे लग्न पुढे ढकलावे लागले. पण आता माध्यमातून येणाऱ्या बातम्यांनुसा ‘ब्रह्रमास्त्र’ च्या रिलीजनंतर लग्न करण्याचे त्यांचे पक्के झाले आहे.

सुष्मिता सेन ही एक अशी अभिनेत्री आहे, जिने आपलं आयुष्य आपल्या मर्जीनुसार जगली आहे. मधे ती आजारी पडली होती. यादरम्यान तिच्या आयुष्यात आला तिच्यापेक्षा 17 वर्षांनी लहान असलेला रोहमन. रोहमन आणि सुष्मिता यांची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. यानंतर ते बराच काळ 'लिव इन रिलेशन' मध्ये राहिले. बातम्यांनुसार यावर्षी त्यांचे लग्न होण्याची शक्यता आहे. यावर्षी सोनाक्षी सिन्हा देखील लग्नाच्या बोहल्यावर चढू शकते. बंटी सचदेव याच्याशी सोनाक्षीचं नातं जुळलं आहे. फिल्म आणि टीव्ही कलाकार एजाज खानचं आणि मॉडेल अभिनेत्री असलेल्या पवित्रा पुण्या यांच्यात नाजूक नाते संबंध जुळल्याची वार्ता आहे. 41 वर्षाच्या एजाज खाननेदेखील यावर्षीचा लग्नाचा मुहूर्त शोधला आहे. कॅटरिना कैफच्याही नावाची चर्चा सुरू आहे.  श्रद्धा कपूर आणि फोटोग्राफर रोहन श्रेष्ठ यांचेही नाते बहरात आहे. बातम्यांनुसार यावर्षी या दोघांचाही लग्नाचा विचार आहे. एका बातमीनुसार फरहान अख्तर तिच्या पेक्षा निम्या वयाच्या  शिबानी दांडेकरसोबत  लग्न करण्याचा इराद्यात आहे. फरहान अख्तरशिवाय मलाइका अरोड़ा खानदेखील तिच्यापेक्षा कमी वयाच्या अर्जुन कपूरसोबत लवकरच लग्नाच्या बेढीत अडकणार आहे.  दिशा पटनी आणि टाइगर श्रॉफदेखील 2021मध्ये लग्न करू शकतात.

हे अडकले लग्नाच्या बेढीत

2020 सगळ्यांसाठीच अडचणींचा गेला. अशा कठीण काळात देखील काही कलाकार मास्क लावून लग्नाच्या बेढीत अडकले. यात सर्वात अगोदर नाव येत ते  गायिका नेहा कक्करचं. तिने लॉकडाऊन काळ असताना सर्व ती खबरदारी घेत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत तिचा प्रेमी रोहन प्रीत यांच्या लग्न बंधनात अडकली. याशिवाय  उदित नारायण यांच्या मुलाने म्हणजेच आदित्य नारायणनेदेखील डिसेंबर 2020 मध्ये श्वेतासोबत लग्न केलं. यानंतर मॉडल अभिनेत्री गौहर खाननेदेखील प्रेमी जैद दरबारसोबत 25 डिसेंबरमध्ये विवाह केला.

प्रसिद्ध अभिनेता वरुण धवन तिची बालपणापासूनची मैत्रीण आणि प्रेमिका नताशा हिच्यासोबत  24 जानेवारी 2021 मध्ये लग्नाच्या बेढीत अडकला. दक्षिण आणि बॉलीवुड कलाकार काजल अग्रवाल हिनेदेखील ऑक्टोबर 2020 मध्ये लग्न केलं. डांसर कोरियोग्राफर प्रभुदेवा यांनी मुंबईतील डॉक्टर हिमानी हिच्याशी लॉकडाऊन काळात अगदी साध्या पद्धतीने आणि अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह केला.याशिवाय साउथ आणि बॉलीवुड एक्टर राणा डग्गूबातीनेही  प्रेमिका मिहिकाशी लग्न केलं. मिहिका इंटीरियर डिजाइनर आहे.

कोरोनाने आणलं जवळ

कुणीच असा विचार केला नव्हता की, आपली स्वतःची कामं स्वतःलाच करावी लागतील. घराबाहेर पडायला देखील बंदी होती. मात्र कोरोना काळाने सगळ्यांनाच एक नवीन विचार दिला. या काळात जेव्हा संपूर्ण आयुष्यच थांबलं तेव्हा काही कलाकारदेखील एकत्र आले. आपल्या कामात ते एकमेकांना वेळसुद्धा देऊ शकत नव्हतं. याच काळात सलमान खान आणि जैकलीन फर्नाडिस त्याच्या फार्म हाउसमध्ये एकत्र राहिले. आलिया आणि रणबीर कपूरदेखील सोबत राहिले. मलाइका अरोरा आणि अर्जुन कपूरसुद्धा एकमेकांसोबत होते. या कालावधीत सतत व्यस्त असणाऱ्या कलाकारांनादेखील जाणवलं की त्यांच्यासाठी त्यांचं प्रेम किती महत्त्वाचं आहे. लग्न आयुष्यभरासाठी कैद असली तरी या बेढीत प्रत्येकालाच राहायला आवडतं.-मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली


यामी गौतम: आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर; जाणून घ्या जीवनप्रवास

बॉलिवूडमध्ये ‘फेअर अँड लव्हली गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री यामी गौतम वेगवेगळ्या भूमिकांसह प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या अभिन...